व्यास-प्रतिभा-दिवाळी-2022

व्यास क्रिएशन्सचा प्रतिभा दिवाळी अंक २०२२

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations

छापील अंकाची किंमत : रु. २००/-

हे पुस्तक मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

SKU: vyas-pratibha-diwali-2022 Categories: , Tags: ,

प्रकाशक संपर्क



व्यास क्रिएशन्स्
डी-१, सामंत ब्लॉक्स, श्री घंटाळी देवी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४०० ६०२.
दूरध्वनी : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०
Email : info@vyascreations.comvyascreations@gmail.com
Facebook : www.facebook.com/joinvyascreations

संपादकीय

अवघ्या अंतरीचे तराणे (संपादकीय)

 

अथांग निळाई, त्यात माडांची
गर्द वनराई झेलीत लाटा चैतन्याची नवलाई
विरघळती त्यात वाळूची दुलई
मोहक रंगाची कोकण हिरवाई.

नितळ, निळेशार किनारे लाभलेल्या हिरवा साज ल्यालेल्या… विविध बोलींच्या, लोककलांची परंपरागत वारसा जपलेल्या संस्कृतींचा आपलेपणाच्या ओढीचा शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचाज्या भूमीने अनेक नररत्ने दिली आहेत. अशा शूरवीरांचा गड आणि किल्ले यांतून इतिहासाची साक्ष देणारा निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा असा हा कोकणचा परिसर म्हणजे जणू सृष्टिसौंदर्याचं कोंदणच!

कोकण म्हणजे महाराष्ट्राचं भूषण. इथली मातीच निराळी. इथला रंगच निराळा. या भूमीला स्वत:चा असा चेहरा आहे. तिची स्वतंत्र ओळख आहे. इतिहास आहे. पण आता केवळ गुणगान करून चालणार नाही, तर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. या निसर्गाने भरभरून दिलं आहे, त्याचा आदर राखत कोकण अधिक समृद्ध कसा करता येईल याचा सर्वांगाने विचार झाला पाहिजे. कोकणवासीयांना आणि समस्त महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मनात ही ज्योत तेवत राहावी यासाठी आम्ही यंदा दीपावलीनिमित्त हे  अक्षरपुष्प गुंफत आहोत. ‘कोकण : स्वयंपूर्णता ते स्वयंसिद्धता’ हा दिवाळी विशेषांक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.

हे नयनरम्य कोकण भविष्यात नक्की कसं असेल? काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा-मोहरा? धावत्या युगात काळाची गणितं दिवसागणिक बदलत जातात. जगण्याची समीकरणं बदलतात.वेगवेगळे प्रवाह येतात या साऱ्या प्रवाहात आणि प्रवासात आपलं कोकण कोणतं रूप धारण करेल? एक कोकणवासीय म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.

कोणताही प्रदेश असं आपण म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर येतो तो तिथला सामान्य माणूस. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या त्याचा होणारा विकास म्हणजेच पर्यायाने त्या प्रदेशाचा होणारा विकास. माणूस समृद्ध तर देश समृद्ध. म्हणून त्या प्रदेशातील उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे आणि तेही इथला मूळ गाभा, घटकांना धक्का न पोहोचता, भावीपिढीच्या भवितव्याचा विचार करून, राजकीय, सामाजिक, वैचारिक संघटन लक्षात घेऊन शाश्वत विकासाचा मूलमंत्र जपत, सर्व स्तरांतून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे वाटते.

निसर्गाची मुक्त उधळण, शेजारी लांबलचक अथांग समुद्र, आंबा-काजूसारखी नगदी पिके असूनही आजही कोकणात बेरोजगारी वाढते आहे. इथला प्रत्येक गावातील वाडीवरचा तरुण स्वतःच्या अस्तित्वासाठी आपलं गाव सोडून मुंबई उपनगरात मिळेल त्या जागेत राहत, लोकलमध्ये लोंबकळत प्रवास करीत दिवस रेटीत आहे.  अर्थात याला अनेक सन्माननीय अपवादही आहेत की ज्यांनी मुंबईसारख्या  महानगरातही आपले बस्तान घट्ट स्थिर केले आहे. पण शेवटी गावातील वाडीवरच्या उंबरठ्यावर म्हातारी माणसे मुलांच्या परतीकडे आशेने डोळा लावून असतात. हे मात्र विसरता येणार नाही.

इथला तरुण गावापासून दूर झालाय, पण त्याची गावची ओढ, जन्मभूमीशी असलेली नाळ तुटलेली नाही. हेही नसे थोडके! म्हणून इथला तरुण कोकणपासून कायमचा दूर जाता कामा नये यासाठी मनातील नकारात्मकता संपवून सकारात्मकता जोपासून ‘कोकणच्या समृध्दीचे’ स्वप्न साकारण्याची जिद्द या लालमातीची ओढ व प्रेम मनामनात चेतवली पाहिजे.

कोकण कृषी विद्यापीठ तसेच अनेक सामाजिक, औद्योगिक आणि स्वयंसेवी अशा कोकणप्रेमी संस्था विविध उपक्रमांद्वारे सर्व बाजूंनी लक्ष केंद्रित करून खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला हातभार लावत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आपणही साथ दिली पाहिजे. कोकणचे निसर्गवैभव एवढे संपन्न आहे की, इथे भेट देणारा पर्यटक त्याच्या प्रेमात न पडला तर नवलच! पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी, विकासाच्या वाटा खुणावत आहेत. देशातील सुमारे 600 जिल्ह्यांपैकी ‘सिंधुदुर्ग’ हा एकमेव असा जिल्हा आहे की, जो ‘संपूर्ण पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला गेला आहे.  कोकणातील इतरही जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळावे यासाठी सगळ्यांचाच सहयोग असणं गरजेचं आहे.

विकासाच्या अनेक संधी इथे उपलब्ध आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया कधी होणार? हा प्रश्न न पडता तो प्रत्यक्षात साकारण्याची वेळ आता आली आहे. कोकणच्या विकासाला गती देणाऱ्या औद्योगिक संस्था, मूळ निवासी उद्योजक विशेष पुढाकार घेऊ शकतात. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आणि पूरक वातावरणाची गरज आहे. त्यासाठी सगळ्यांचा विकास आणि सगळ्यांचीच साथ मोलाची ठरणार आहे. स्वयंशिस्त आणि स्वयंसिद्धता कशी अंगीकारता येईल याचाही यानिमित्ताने विचार करू या!

कोकणच्या मातीची ओढ जागृत राहावी या विचाराने आम्ही व्यास क्रिएशन्स् ग्रुप ऑफ कंपनीज् गृहप्रकल्पाच्या निमित्ताने आपले पाऊल टाकत आहे. ‘चला खेड्याकडे’ या धर्तीवर ‘कोकणात येवा’ हा आनंदसंदेश या निमित्ताने पोहोचवण्यासाठी ‘फॅमिली कट्टा’ आणि फक्त ज्येष्ठांसाठी आनंदधाम ‘सांजराई’ हे प्रकल्प उभारत आहोत. मनामनांतील कोकणप्रेम वाढून मनामनांतील हिरवं कोकण ताजेतवाने करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

प्रस्तुत दिवाळी अंकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत लेखकांनी, साहित्यिकांनी कोकणच्या गौरवाचं, समृद्धीचं प्रतिबिंब मांडलं आहे. भविष्यकालीन चिंतनासाठी हे विवेचन मौलिक ठरणार आहे, याची आम्हाला खात्री आहे.

सुंदर विचारांची बीजे फार पूर्वापार पेरली गेली आहेत. कोकणच्या अनुपम लावण्याने ती अधिकाधिक मोहरावीत हीच अपेक्षा. दिवाळी हा सणच तर यासाठी आहे. हा सण आहे दिव्यांचा, प्रकाशाचा. नात्यांना जपणारा. चला उत्तम विचारांची पेरणी करू या आणि यंदाची दिवाळी संस्मरणीय करू या!!

या काळजाचे त्या काळजात ओतणे
सुमधुर बोल… जो जागवील आपले गाणे
तयातूनच घडेल, अवघ्या अंतरीचे तराणे !!

– नीलेश वसंत गायकवाड